महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकारने पद्म भूषण पुरस्काराने गौरवले. या निर्णयावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. भगतसिंग कोश्यारी यांना अशा कोणत्या कारणाने हा पुरस्कार देण्यात आला? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारला असता त्यांनी राम कृष्ण हरी असं म्हणत थेट हातच जोडले.
कटू आठवणी कायम मनात राहतील
सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या काळात महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत काय वक्तव्य केलं होतं हे आपल्याला माहिती आहे. आमच्यासाठी हे त्रासदायक आहे. शिवाय या कटू आठवणी कायम मनात राहतील अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलीय.
संजय राऊत काय म्हणाले होते
महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान,” अशा शब्दात संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.
फडणवीसांनी सांगितलं कारण
दरम्यान, भगतसिंग कोशारी यांना केंद्राने पद्म भूषण पुरस्काराने का गौरवले याचे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. भगतसिंह कोश्यारी यांचे जीवन प्रगल्भ आहे. त्यांचे मोठे कार्य म्हणजे वन रँक वन पेन्शन आहे. पहाडी भागात कोश्यारी यांनी मोठ काम केलं आहे. टीका करणारे छोट्या मनाचे लोक असल्याने ते विरोध करत आहेत. कोणाच्या काळात कोणाला आणि कसे गौरविले, हे आता बोलणे योग्य नाही,” असा टोला फडणवीसांनी लगावला.





