Sat, Dec 27, 2025

उत्तर भारतात थंडीचा कहर; महाराष्ट्रात गारठा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात तापमानाचा पारा आणखी खाली येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
उत्तर भारतात थंडीचा कहर; महाराष्ट्रात गारठा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज

डिसेंबरचा शेवट जवळ आला तरी देशभरात थंडीचा कडाका कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. महाराष्ट्रात दिवसा हलका उकाडा जाणवत असला, तरी रात्री आणि पहाटे गार वाऱ्यांमुळे थंडी तीव्र होत आहे. उत्तर भारतात दाट धुके, कोल्ड वेव्ह आणि संभाव्य बर्फवृष्टीमुळे हवामानाने रौद्र रूप धारण केले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रातील तापमानावरही होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे एकुणच आगामी काही दिवसांत देखील राज्यातील थंडीचा कडाका असाच कायम राहण्याची शक्यता आहे. आज 27 डिसेंबर रोजी हवामानाची स्थिती नेमकी कशी असेल, ते जाणून घेऊ…

महाराष्ट्रातील थंडीत वाढ होण्याचा अंदाज

पंजाब, हरियाणा आणि उत्तर भारतात सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय आहे. हिमालयीन पट्ट्यातील संभाव्य बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग वाढणार आहे. या थंड वाऱ्यांचा परिणाम मध्य भारत आणि महाराष्ट्राच्या हवामानावरही होण्याची शक्यता आहे. सध्याची थंडी डिसेंबरच्या अखेरीसही कायम असून, पुढील 72 तासांत विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान घसरण्याची शक्यता आहे.

30 डिसेंबरपासून हिमालयीन भागात पुन्हा बर्फवृष्टी होण्याचा अंदाज असून, त्यानंतर 4 ते 5 दिवसांनी किमान तापमानात 2 ते 3 अंशांची किंचित वाढ होऊ शकते. भारतीय हवामान विभागाने (IMD) हा अंदाज वर्तवला असून, हवामान तज्ज्ञांनी नागरिकांना थंडी आणि धुक्याबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे एकुणच 30 डिसेंबरपर्यंत तरी राज्यातील थंडीचा कडाका असाच कायम राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात थंडीत वाढ; आरोग्य जपा !

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात तापमानाचा पारा आणखी खाली येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. कडाक्याच्या थंडीत आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थंड तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे शरीर उबदार राहील अशी कपडे घालणे, गरम पाणी पिणे आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे आणि घरात पुरेशी हवेशीर व्यवस्था ठेवणे फायदेशीर ठरते. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि अस्थमा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घ्यावी. व्यायाम करताना शरीरावर थंडीचा परिणाम होऊ नये म्हणून योग्य कपडे वापरावेत. पुरेसे पाणी पिणे आणि विश्रांती घेणेही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

थंडीत हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण, तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे किंवा आधीपासून हृदयाचे विकार असलेल्या व्यक्तींनी खास काळजी घेणे आवश्यक आहे.