काही दिवसांपासून राज्यभर पसरलेल्या थंड हवेमुळे अनेक भागात गारठा जाणवत आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यभरातील तापमानात कमालीची घसरण झाल्याचं दिसत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांत थंडीची लाट आली आहे. थंडीची ही लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील मोठी तफावत नागरिकांना जाणवू लागली असून राज्यभर हिवाळ्याचा प्रभाव तीव्र होताना दिसत आहे. उद्या 22 डिसेंबर रोजी देखील राज्यात कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागांत तापमानात चांगलीच घसरण झाली आहे. थंडीचा कडाका अधिक तीव्र झाला आहे. हवामान खात्याने राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. मंबईचे कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता असल्याने दिवसा उकाडा आणि रात्री गारवा असा अनुभव मुंबईकर घेत आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, सोलापूर या भागांचा समावेश आहे.
गेल्या 24 तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवलेले तापमान पाहिले तर मुंबई (सांताक्रूझ) 17.4 अंश सेल्सिअस, मुंबई (कुलाबा) 20.8 अंश सेल्सिअस, अहिल्यानगर 6.5 अंश सेल्सिअस, गोंदिया 8.0 अंश सेल्सिअस, मालेगाव 8.2 अंश सेल्सिअस, नागपूर 8.2 अंश सेल्सिअस, पुणे 8.4 अंश सेल्सिअस, यवतमाळ 8.5 अंश सेल्सिअस, परभणी 8.9 अंश सेल्सिअस, बीड 8.9 अंश सेल्सिअस होते. राज्यातील सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे नोंदवले गेले.
थंडीत हार्ट अटॅकचा धोका; हृदयाचे आरोग्य जपा !
सध्या सर्वत्र थंडीचा कडाका पाहायला मिळतोय, अशा परिस्थिती हार्ट अटॅकचा धोका वाढत असतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की वर्षभरातील उष्ण महिन्यांच्या तुलनेत, सर्वात थंड हिवाळ्याच्या महिन्यांत लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30% जास्त असू शकते. हिवाळ्यातील थंडीची लाट केवळ गारवा घेऊन येत नाही, तर ती हृदयविकार असलेल्या लोकांसाठी आरोग्याची गंभीर समस्या निर्माण करू शकते.
हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. थंडीत उबदार कपडे घाला आणि पुरेसे पाणी प्या, कारण पाण्याची कमतरता आणि थंडीमुळे रक्त घट्ट होऊ शकतं. दिवसातून थोडा चाला किंवा हलका व्यायाम करा, जेणेकरून रक्तप्रवाह सुरळीत राहील. जास्त तेलकट अन्न टाळा, फळे आणि भाज्या खा. धूम्रपान व मद्यपान टाळा. रक्तदाब व साखर वेळोवेळी तपासा. या सवयी अंगिकारल्यास हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.





